Showing posts with label मराठी अस्मिता. Show all posts
Showing posts with label मराठी अस्मिता. Show all posts

Monday, 7 September 2020

मराठी अस्मितेच्या नावाने प्रचंड गोंधळ चाललाय.

दोन दिवसांपासून कंगना राणावत आणि मराठी अस्मितेच्या नावाने प्रचंड गोंधळ चाललाय. मुळात मराठी अस्मिता वगैरे गप्पा मारणाऱ्या थोतांड लोकांनी थोडा आपला इतिहास बघावा. मराठी अस्मिता जपली पाहिजे याच मताचा मीही आहे, मराठी अस्मितेला धक्का लागू नये मात्र मराठी अस्मिता ही काही पार्ट टाइम काम करत नाही. राज्यकर्त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हाच, जेव्हा वाटेल तेव्हाच दुखावली वगैरे म्हणायला. ज्यांना खरंच अस्मिता वाचवायची आहे, जपायची आहे त्यांनी कामातून, आपल्या कृतीतून दाखवावी.
मुळात हा विषय काही सिद्धही करण्याचा नाही! एकवेळ तेही सोडून द्या. प्रत्येकजण आपापल्या परीने ते जपत असतोच.

मात्र सातत्याने शिवसेना आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने मराठी अस्मितेच्या नावाने चांगभलं गाजवत आहेत त्यांना प्रश्न तर विचारले पाहिजेत.
मराठी अस्मिता म्हणजे काय? फक्त मराठी माणूस? फक्त मराठी संस्कृती? फक्त मराठी विचारधारा? याचं उत्तर काय आहे हे आपल्या आपल्या अंतःकरणाला विचारा!

पण जर होय असेल तर जी शिवसेना आज अस्मितेच्या नावावर गुंडगिरी करतेय ते नेमकं कोणत्या अस्मितेत आहे? महाराष्ट्राचं पावित्र्य अन उंची जपली पाहिजे हे सर्वांना वाटतं, अगदी मलाही! पण त्या आडून जर तुम्ही धमक्या, गुंडगिरी अन मनमानी करत असाल तर कठीण आहे!

शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात, कंगना राणावत ने इकडे मुंबईत येऊन दाखवावं, आता आज तर म्हणाले, बापाला घेऊन यावं, हरामखोर बाई आहे. ही आहे का मराठी अस्मितेचा उदोउदो करणाऱ्या शिवसेनेची भाषा?
आमदार सरनाईक म्हणाले, कंगनाने मुंबईत पाय ठेऊन दाखवावा, आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील!
हे सरनाईक ज्या लोकशाहीच्या जीवावर निवडून गेले ते थोबाड फोडक्याची भाषा करतात हेच मुळात लोकशाहीला लाजिरवाणी गोष्ट आहे. थोबाड कुणाचं फोडता? का फोडता?
तुमच्या त्या रणरागिनींना एक निरोप द्या! संजय राऊत सैनिकांना तंबाखू चोळत बसले होते का म्हणाले, तेव्हा कुठे गेल्या होत्या रणरागिणी? त्यांना सांगा, कोरोना कॉरंटाईन सेंटरमध्ये बलात्कार होताहेत, महाराष्ट्रातल्या कोणत्याच रुग्णालयात सहज उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, बेड नाही, व्हेंटिलेटरवर नाही,  राज्यातल्या पोलिसांना खुलेआम मारले जातेय, साधूंना पोलिसांच्या देखत मारले जाते, राज्यातल्या सर्वसामान्य माणसाना मुद्दामहुन वीजबिल वाढवून लुटणे सुरुय, सामान्य माणसांना बंगल्यावर नेऊन मारले जाते, रोज खून सुरू आहेत, 20 रुपयांचा मास्क 200 रुपयांना विकताहेत, गरिबांना दिलेले धान्य थेट परदेशात विकले जातेय, डॉक्टरांना, अंगणवाडी सेविकांना, आशा वर्करला, एस टी कामगारांना पगार मिळत नाही. हे इतकं सगळं सुरुय अन त्याला जबाबदार असणाऱ्यांचे थोबाड फोडा! जर तुम्ही यांचं थोबाड फोडलं तर लोक जाहीरपणे तुमचे सत्कार घेतील, कौतुक करतील.
कारण ही आजच्या क्षणाची गरज आहे.
पण ते तुमच्याने होणार नाही, सोडून द्या.

मराठी माणसांची मराठी अस्मिता असणाऱ्या मुंबईत आज पालकमंत्री कोण आहेत? शिवसेनेचे अस्मिता प्रेम राज्यसभेत का दिसत नाही? आज राज्यसभेत प्रियांका चतुर्वेदी आहेत. ज्या चतुर्वेदी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव "बाळ ठाकरे" असं घ्यायच्या. मागच्या महिन्यात मुंबईत करिष्मा भोसले नावाची एक भगिनी मशिदीवरचे भोंगे उतरवा म्हणून आवाज उठवत होती तेव्हा तिच्या पाठीशी शिवसेना का नव्हती? उलट आझमीने तिला मुंबई सोडून जा अशी धमकी दिली तरीही शिवसेना का आली नाही? मराठी अस्मितेचं नाव घेता न, मग ज्यावेळी सैराट हा मराठी सिनेमा आला तेव्हा याच शिवसेनेने विरोध का केला होता? आज राज्यातील दारू अन बार सुरू आहेत पण मंदिरे का बंद आहेत? आज राज्यात हजारो मराठी माणसं मरताहेत मात्र घराचे दार लावून उद्धव ठाकरे बसले आहेत? मरणारी मराठी माणसंच आहेत मग आता अस्मिता कुठेय? एक अबू आझमी महिला पोलीस अधिकाऱ्याला जाहीर धमकी देतो अन त्याला घाबरून सरकार बदली करते तिथे अस्मिता झोपली होती का? केम छो वरळीचे पोस्टर शिवसेनेने लावले तेव्हा मराठी अस्मिता नव्हती का? किरण राव म्हणाली होती की भारतात सुरक्षित वाटत नाही तेव्हा रणरागिणी आणि अस्मिता कुठे गेली होती? उद्धव ठाकरे पोलीस अधिकाऱ्यांना म्हणाले होते की,भाजपाची धुणीभांडी करू नका, राजीनामा द्या, संडास बाथरून धुवा. हा अस्मितेचा अपमान नव्हता का?
आझाद मैदानावर दंगे करणाऱ्या रझा अकादमीला मांडीला मांडी लावून बसता तेव्हा मराठी अस्मिता सुट्टीवर होती का? नवाब मलिकचा भाऊ कप्तान मलिक जेव्हा मराठी कामगाराला मारहाण करतो तेव्हा शिवसेना अन मराठी अस्मिता कुठे होती? तेही सगळं सोडून द्या. छत्रपती शिवरायांच्या नावाने पक्ष काढला, राजकारण करता त्या शिवरायांच्या वंशजांना संजय राऊतांनी पुरावे मागीतले तेव्हा या थोबाड फोडणाऱ्या रणरागिणी अन अस्मिता कुठे गेली होती? छत्रपती उदयनराजेंनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सभागृहात जय भवानी जय शिवाजी या घोषणेवर आक्षेप घेतला तेव्हा अस्मिता कुठे होती? शिवसेना अन रणरागिणी तेव्हा का गेल्या नाहीत?
हे एवढेच नाही अनेक प्रश्न आहेत मराठी अस्मिता असलेल्या महाराष्ट्राच्या मनात.

मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना एवढंच सांगतो, "बात निकली हैं तो दुर तक जायेगी।"
ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत सत्तेत बसली तेव्हाच मराठी अस्मितेचा जीव गुदमरला. अन जेव्हा सोनिया गांधींच्या बैठकीत खुद्द उद्धव ठाकरे यांनी इजाजत, माफी मागितली तेव्हा तिचा अंत झाला.

राजकारणाने आता कुस बदलली आहे, विकासाच्या मुद्द्यावर या, कोकणात वादळी वाऱ्याने मराठी माणसांचे संसार उध्वस्त झाले तेव्हा सरकार कुठे होते? पाऊस येणार म्हणून दौरा रद्द करणारे उद्धव ठाकरे अन शिवसेना आज मराठी अस्मिता सांगते? मराठा मोर्चाच्या आंदोलनावर आठवा काय होते व्यंगचित्र? आज विदर्भात पूर आला आहे, उद्धव ठाकरे चकार शब्द बोलले नाहीत, ना त्यांच्या मदतीला कोणी धावून गेले. तिथं संकटात अडकलेली लाखो माणसं ही मराठी आहेत. कुठेय आता अस्मिता?

कंगना राणावत हा काही खूप मोठा विषय नाही. तिचं थोबाड फोडायला जाणाऱ्या रणरागिणी अन शिवसैनिकांनो सगळी ताकद जर राज्यातल्या तरफडणाऱ्या रुग्णांना बेड मिळावे, ऑक्सिजन मिळावा, व्हेंटिलेटर मिळावे, अम्ब्युलन्स मिळावी यासाठी लावली तर खऱ्या अर्थाने अस्मितेचा झेंडा उंचावेल.
मराठी अस्मिता ही जपण्याचा, अंगिकरण्याचा अन कृतीतून सार्थ करण्याचा विषय आहे. एवढं जरी करता या तर पुरेसं आहे. बाकी सगळं आलबेल आहे! जोवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहे तोवर तरी अस्मितेवर राजकारण करू नका, तो अधिकार नाही तुम्हाला! तुमचं सगळं सोयीस्कर घ्यायला राज्यातली लोकं काय धोतरावर इन करत नाहीत!🙏🙏

(पटलं तर अवश्य शेअर करा.)